कर्नाटकात उसदराच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. राज्य सरकारने उसाचा दर प्रती टन ₹३३०० इतका निश्चित केल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) बेंगळुरू येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दर जाहीर होताच बेळगाव जिल्ह्यातील गुर्लापूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन छेडले होते. दरम्यान, दोन मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर शुक्रवारी सायंकाळपर्यंत उसदराविषयी निर्णय घ्यावा अशी अंतिम मुदत शेतकऱ्यांनी दिली होती.
सरकारकडून दर घोषित झाल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, तर ऊस कारखानदारांकडूनही सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.

