बेळगाव :
ऊस दरवाढीच्या मागणीने आज बेळगावात पुन्हा एकदा शेतकरी आणि कन्नड समर्थक संघटना रस्त्यावर उतरल्या. सर्किट हाऊसजवळ सुरू झालेलं हे आंदोलन नंतर राणी चन्नम्मा चौकात पोहोचलं. आंदोलकांनी ठिकठिकाणी घोषणाबाजी करत ऊसाला प्रति टन ₹३५०० हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली.
दरम्यान, आंदोलकांनी टायरांना आग लावण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली. वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.
कन्नड कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या वेळी भाष्य करताना सांगितले की, “आज गुरलापूर येथील शेतकऱ्यांचा संघर्ष हा १९८० च्या नरगुंद-नवलगुंद आंदोलनाची आठवण करून देतो. त्यावेळी अनेक शेतकरी शहीद झाले होते. आजही परिस्थिती तशीच आहे. साखर कारखानदारांना प्रति टन ऊसामागे सुमारे ₹१४,००० नफा मिळत असताना शेतकऱ्यांना केवळ ₹३५०० मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चंदरगी यांनी सरकारला आवाहन करत सांगितले की, ऊस दर निर्धारणासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे आणि व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारी वजनकाटे कारखान्यांवर बसवावेत.
रॅलीदरम्यान तणाव वाढताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी नंतर परिस्थिती सामान्य झाली.

