खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींच्या कळपाने थैमान घातले असून हातातोंडांशी आलेल्या लाखो रुपयांच्या भातपिकाचे मोठे नुकसान केले आहे.हत्तीच्या आगमनामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून भात पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
हत्ती आपल्या शेताकडे येत असल्याची माहिती मिळताच गावातील दहा-पंधरा शेतकरी हत्ती पळवण्यासाठी फटाके घेऊन एकत्र आले होते. मात्र हत्तीनी चतुराईने शेतकऱ्यांना चकवा देऊन शेतकरी
थांबलेल्या ठिकाणापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असलेल्या मारूती तांबुळकर यांच्या शेतात घुसून नुकसान केले. शेतकऱ्यांना याची कल्पनाच झाली नाही आणि काही वेळातच त्यांनी आपले भात पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले.

