बेळगाव |
जनकल्याण ट्रस्टच्या संत मीरा इंग्लिश माध्यम शाळा आणि विद्याभारती कर्नाटक – बेळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सप्तशक्ति संगम – 2025-26’ हा सांस्कृतिक व बौद्धिक महोत्सव शनिवारी माधव सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी 11.30 वाजता पूजा व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वेदिकेवर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, सौ. तृप्ती हिरेमठ, सौ. गौरी गजबरे, मुख्याध्यापिका व प्रांत कार्यवाहिका सौ. सुजाता दप्तरदार, तसेच सहमुख्याध्यापिका सौ. ऋतूजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. सोनाली सरनोबत यांनी आरोग्य, स्त्रीची सामाजिक भूमिका आणि सांस्कृतिक मूल्यांच्या संवर्धनावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी समाजघटकांमधील संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी सजग राहावे असे सांगितले.
मुख्य भाषणात सौ. तृप्ती हिरेमठ यांनी जिजाऊ-माऊलींच्या संस्कारांनी छत्रपती शिवरायांमध्ये घडविलेल्या धैर्य-संकल्पाची प्रेरणादायी मांडणी केली. सप्तशक्तीचे तात्त्विक अनावरण, पर्यावरण संरक्षण आणि “हिरवेच श्वास – श्वासच हिरवा” हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रूजवला.
सौ. गौरी गजबरे यांनी कुटुंबव्यवस्थेतील मातृशक्तीची भूमिका, संस्कारप्रधान समाजनिर्मितीत महिलांचे योगदान आणि मार्गदर्शनाची गरज यावर हृदयस्पर्शी विचार मांडले.
निवेदन सौ. तिलोत्तमा गुमास्ते यांनी तर अतिथी परिचय सौ. अमृता पिटकेर यांनी केला.
संकल्प वंदनेनंतर वीणा जिगिजिनी व राधा गुणगा यांना ‘साधक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा परिचय सौ. वीणा जोशी यांनी दिला. तसेच सौ. पद्मिनी कुलकर्णी यांनी सादर केलेले गीत सभागृहात विशेष रंग भरून गेले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून प्रस्तुत केलेले देवींच्या शक्तितत्त्वाचे प्रतीक असलेले छद्मवेश प्रदर्शन उपस्थितांची दाद मिळवून गेले. मुलांनी सादर केलेल्या प्रत्येक शक्तिरूपातून तात्त्विक मूल्यांचा प्रभावी संदेश पोहोचला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्त्रीशक्ती, संस्कार आणि सामाजिक सजगतेचे महत्त्व सांगितले.
यावेळी विद्याभारती कर्नाटकच्या प्रांत कार्यवाहिका सौ. सुजाता दप्तरदार, प्रांत पदाधिकारी रामकृष्णजी, उपाध्यक्ष माधव पुणेकरजी, किशोर काकडेजी, व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 250 हून अधिक सहभागींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष दिमाख लाभला.
स्वप्ना देशपांडे आणि ज्येष्ठी मोटे यांनीही आपली मते मांडली.
“भारत देश योगभूमी” या भावनेने वंदनार्पण मुख्याध्यापिका सौ. सुजाता दप्तरदार यांनी केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.
एकूणच, पालक–शिक्षक–विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे ‘सप्तशक्ति संगम’ हा प्रेरणादायी, संस्कारप्रधान आणि यशस्वी ठरला.

