बेळगाव :
गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणाला गुरुवारी महत्वाचा टप्पा गाठला. या प्रकरणातील 125/2015 क्रमांकाच्या गुन्ह्यातील सर्व 42 आरोपींना न्यायालयाने सबळ पुरावे व साक्षीदारांच्या विसंगतीच्या कारणास्तव निर्दोष मुक्त केले आहे.
या नामफलक प्रकरणात सुरुवातीला एकूण सात खटले दाखल झाले होते. त्यामध्ये 42 आरोपींवर गुन्हे नोंदवले गेले होते. यातील सात आरोपींना वगळण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 32 आरोपींवर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी तीन खटल्यांचा निकाल लागला असून चार खटले प्रलंबित होते. त्यापैकी आज एका खटल्याचा निकाल लागून सर्व आरोपींची मुक्तता झाली आहे.
आरोपींच्या वतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर व ॲड. श्याम पाटील यांनी कामकाज पाहिले. निकालानंतर बोलताना ॲड. श्यामसुंदर पत्तार म्हणाले,
"२७ मे २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा नामफलक हटवण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थांचा तीव्र संताप उसळून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. याच घटनेवरून २५० ते ३०० ग्रामस्थांवर पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले होते. त्यातील १२५/२०१५ या गुन्ह्यातील सर्व आरोपींना आज निर्दोष मुक्त करण्यात आले आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, सातपैकी चार खटल्यांचा निकाल येळ्ळूरवासियांच्या बाजूने लागला असून, उर्वरित तीन खटल्यांमध्ये देखील ग्रामस्थांची निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास आहे.

