कंग्राळी बिके गावात सुरू असलेल्या जल जीवन मिशन व फ्लेवर्स बसवण्याच्या कामामुळे विकासाऐवजी नागरिकांचे हाल वाढले आहेत. गावातील मुख्य रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवण्यात आल्याने मागील एक महिन्यापासून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे.
या अपूर्ण कामाचा थेट फटका गावातील दैनंदिन जीवनाला बसत असून, गावात येणारी बससेवा बंद झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी यमुनापूरपर्यंत पायी चालत जावे लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे.
शाहूनगरकडून येणारी बस थेट गावात प्रवेश न करता तलाव परिसरातच वळत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकास कामे आवश्यक असली तरी ती वेळेत आणि नियोजनबद्धरीत्या पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
https://youtu.be/Wyu1VpDbqeA?si=WaIYzT645q2iLMte
संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी कंग्राळी बिके ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

