बेळगाव | प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील कडोली गावात पारंपरिक ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या बैल शर्यतींना रविवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लोकोपयोगी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते या शर्यतींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कडोली गावात खेळाचे मैदान, रस्ते, पूल उभारणीसह विविध विकास प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती दिली.
स्वाभिमानी शेतकरी युवक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींना सहा वर्षांची परंपरा असून, दरवर्षी या स्पर्धांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ व स्पर्धा पाहताना आपल्या संस्कृतीचे जिवंत दर्शन घडते, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. युवकांचा उत्साह प्रेरणादायी असून, भविष्यात अधिकाधिक बैलगाडी जोडी शर्यती आयोजित व्हाव्यात, यासाठी आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, स्पर्धेदरम्यान एत्तिणांवर कोणत्याही प्रकारचा छळ अथवा मारहाण होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देशही मंत्र्यांनी दिले.
ग्रामीण भागात सध्या सर्वांगीण विकास घडून येत असून, जनतेच्या सहकार्याने आणखी विकासकामे हाती घेतली जातील. शासन आणि जनता एकत्र येऊन विकासाची गती वाढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय सहायक मलगौडा पाटील यांनीही भाषण करताना यमकनमर्डी मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील पशुधनासाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धांमध्ये कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या बैल गाड्यांनी सहभाग घेतला. लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी रंगलेल्या या शर्यतींमध्ये प्रेक्षकांनी शिट्ट्या, टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने स्पर्धेचे चित्रीकरण करण्यात आले.
तासन्तास चाललेल्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी उष्णतेची पर्वा न करता मोठी गर्दी केली. यावेळी राजू, अरुण कटांबळे , सुधीर पाटील, सागर, सिद्धू सुणगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

