बेळगाव | दीर्घकाळ पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मुत्यानट्टी गावातील नागरिकांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांच्या हस्ते गावातील ५ लाख लीटर क्षमतेच्या नव्या पाण्याच्या टाकी आणि २४ तास जलपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रकल्पामुळे मुत्यानट्टीसह परिसरातील पाणीपुरवठ्याचा जुना प्रश्न आता कायमस्वरूपी मिटणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात बोलताना मंत्री भैरती सुरेश यांनी उत्तर बेळगावचे आमदार आसिफ सेठ यांच्या विकास उपक्रमांचे कौतुक केले. बेळगावच्या पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार व्यवस्था उभारणीसाठी त्यांच्या विभागाकडून तब्बल १००० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.
ही महत्वाकांक्षी योजना KUIDFC, महानगरपालिका बेळगाव आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने KUWSMP मार्फत राबविण्यात आली आहे. महापौर मंगेश पवार, आमदार आसिफ सेठ, उपमहापौर वाणी जोशी, आयुक्त कार्तिक एम., तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे लोकार्पण झाले.
आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, अनेक वर्षे मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागात आता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. मंत्र्यांनी मंजूर केलेल्या ५ कोटींच्या विशेष अनुदानातून आणखी एक पाणीपुरवठा प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गावातील नागरिकांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले,
“पूर्वी पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. आता ५ लाख लीटर क्षमतेची टाकी आणि २४ तास पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे आमची जुनी चिंता संपली आहे.”
कार्यक्रमास महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

