बेळगाव :
APMC परिसरात असलेले नेमदी सेवा केंद्राचा उद्देश नागरिकांना इन्कम सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा सुरळीत व जलद पुरवठा करणे हा होता. मात्र प्रत्यक्षात या केंद्रातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे.
सकाळी फक्त एक-दोन तास केंद्र उघडे राहते, तर दुपारी “जेवणाला जातो” या कारणाखाली अधिकारी केंद्र बंद करतात. जेवणानंतर परत येतात की नाही—याचा काही ठावठिकाणा नसल्याने, प्रमाणपत्रांसाठी आलेल्या नागरिकांना निष्फळ प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांनी तक्रार केली की “येथील अधिकारी येईल तेव्हा येतात आणि मनाला येईल तेव्हा जातात. आम्ही तासन्तास रांगेत उभे राहतो, पण कार्यालय उघडेल याची खात्रीही नसते.”
या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, नोकरभरती प्रक्रियेत असलेल्या युवकांचे तसेच तातडीच्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असलेल्या नागरिकांचे काम खोळंबत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला कडक मागणी करत सांगितले की—
➡ हे केंद्र नियमित वेळेत आणि कायमस्वरूपी सुरु राहावे,
➡ अनियमित उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
➡ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता आणावी.
सार्वजनिक सेवांचा हेतू लोकांना सुविधा देण्याचा असताना, प्रत्यक्षात येथे “सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी” उघडपणे दिसून येत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या सेवेला शिस्तबद्ध करावे, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

