कंग्राळी खुर्द (बेळगाव) :
एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळा दिनाच्या निषेध फेरीत कंग्राळी खुर्द गावातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रात्री गावभर घोषणाबाजी करत जागृती मोहीम राबविण्यात आली.
“हा लढा न्यायासाठी असून आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी आहे,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. संविधानाने दिलेल्या हक्कांनुसार मराठी भाषिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियोजनानुसार शांततेत निषेध फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
जागृती फेरीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी झाला. यावेळी जि.प. सदस्या सरस्वती पाटील आणि माजी अध्यक्ष यल्लप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सांगितले की,
“सीमाप्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि सत्य आपल्या बाजूने आहे. न्यायदेवता आपल्याला नक्कीच न्याय देईल, पण आपली ताकद आणि एकजूट दाखवण्यासाठी सर्वांनी सकाळी आठ वाजता शांततेत फेरीत सहभागी व्हावे.”
या वेळी म.ए. समितीचे तालुका चिटणीस अॅड. एम.जी. पाटील, बीडी मोहनगेकर, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, रूक्मिणी निलजकर, प्रेमा जाधव, रेखा पावशे, प्रेमा पाटील, वाय.आर. पाटील, बी.एन. पूजारी, के.एम. जाधव, के.बी. पाटील, बी.के. बाळेकुंद्री, शाहीर बाबुराव पाटील, बाळू पाटील, प्रकाश पाटील, दिनेश मुतगेकर व निंगोजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठी एकतेचा संदेश दिला.

