बागलकोट दगडफेक प्रकरण : मिरवणुकीवरील हल्ल्यानंतर कठोर कारवाईची मागणी
बेळगाव | प्रतिनिधी
बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणावरून वातावरण तापले असून, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री राम सेना बेळगावच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जयंती उत्सव शांततेत सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, शिवजयंतीच्या पावन सोहळ्याला गालबोट लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
https://youtube.com/shorts/6kvVezzZ09g?si=4HaSxXwq1fDzuto9
या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत असली तरी, उर्वरित आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्या मागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करून त्यांना जिल्हाबंदी करण्याची मागणीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटक प्रदेशाध्यक्ष श्री रविकुमार कोकित्तकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

