बेळगाव :
मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वी केली असली तरी त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या मागण्यांसाठी श्रमिक संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सीमाभागातील अनेक गिरणी कामगार मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी ७ मार्च रोजी बेळगावजवळील बोडकेनहट्टी येथे कामगारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या संख्येने कामगारांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
आज चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी आणि अडकूर आदी गावांतील कामगार मुंबईकडे रवाना झाले.
यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीव कुमार, अतुल दिघे, केदारी पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

