नंदगड | प्रतिनिधी
नंदगड येथे सोमवारी होणाऱ्या वीरभूमी लोकार्पण आणि क्रांतिकारक संगोळी रायन्ना यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी प्रशासन व आयोजकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी रविवारी कार्यक्रमस्थळी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सोमवारी दुपारी १२ वाजता वीरभूमीचे लोकार्पण करणार असून, कनक गुरुपीठाचे डॉ. निरंजनानंद पुरी महास्वामी यांच्या पावन सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, उपस्थित सर्व नागरिकांसाठी भोजन व्यवस्थेची विशेष जबाबदारी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वीकारली आहे. चन्नराज हट्टीहोळी यांनी भोजन व्यवस्थेच्या तयारीचीही प्रत्यक्ष पाहणी करत कोणतीही त्रुटी राहू नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यक्रम शिस्तबद्ध, सुरक्षित आणि यशस्वीपणे पार पडावा यासाठी प्रशासन, स्वयंसेवक व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले.

