बेळगाव शहरातील कसई गल्ली परिसरात ड्रेनेज जोडणीसाठी खोदलेला रस्ता अद्याप पूर्ण करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी धोका वाढला आहे.
याशिवाय, परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कसई गल्लीमध्ये असलेल्या बीफ मार्केट आणि फिश मार्केटमधून निर्माण होणारा कचरा येथेच साचत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच मातंगी देवी मंदिर हेही याच भागात असून जयंतीची सुरुवात याच ठिकाणाहून केली जाते. मात्र सध्याच्या अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. जयंतीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
आंबेडकर जयंतीपूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

