अलतगेतील रोजगार हमी कामगारांना काम द्या; ग्रामस्थांचे पीडीओंना निवेदन
बेळगाव : अलतगे गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून काम मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रोजगार हमी योजनेच्या कामगारांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी देवस्थान पंच समिती आणि ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी केली आहे.
देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे आणि गणपत सुतार यांच्या नेतृत्वाखाली कंग्राळी खुर्द येथील पीडीओ गोपाळ नाईक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अलतगे गावातील रोजगार हमी योजनेच्या कामगारांना मागील चार ते पाच महिन्यांपासून काम उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या कामगारांना तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच येत्या १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर गावातील गटारांची स्वच्छता, पथदीपांची दुरुस्ती आणि विद्युत रोषणाईची योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
रोजगार हमी योजनेच्या लीडर्स पूजा चौगुले, अनिता होनगेकर, सुमन पाटील, वंदना आलोजी, अनिता पाटील आणि सुमन दळवी यांनीही गावातील ज्येष्ठांच्या मदतीने हे निवेदन सादर केले. यावेळी महादेव पाटील, बंडू चौगुले यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पीडीओ गोपाळ नाईक यांनी बुधवारपासून (दि. ११) गावातील गटार स्वच्छता आणि पथदीप दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येतील, तसेच गुढीपाडवा सणानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

