दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भारत गौरव रत्न श्री सन्मान अवॉर्ड कौन्सिल आयोजित भव्य सोहळ्यात बेळगाव जिल्ह्यातील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. मौनेश्वर बाबू गरग यांना समाजसेवा व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान राजस्थानचे माजी राज्यपाल कालराज मिश्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील जनहितासाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सक्रिय योगदानाची दखल घेऊन हा गौरव प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या समारंभास विविध देशांच्या दूतावासांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लिथुआनियाच्या प्रजासत्ताकाचे भारतातील दूतावासाचे उपप्रमुख लुकास किसिएलियस, व्हेनेझुएलाच्या दूतावासातील सल्लागार मारिया जोसे गोमेज अर्रिएटा, झिम्बाब्वे प्रजासत्ताकाच्या दूतावासाचे उपप्रमुख पीटर होबवानी, टांझानिया उच्चायोगातील अनिसा कापुफी मबेगा, तसेच डॉ. सुनील कुमार, कविता बजाज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मौनेश्वर बाबू गरग हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून ग्रामपंचायत स्तरावरून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणे हे बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

