संघर्षातून नेतृत्वाकडे : बेळगावच्या मराठा समाजाची आशा – किरण जाधव
बेळगावचा मराठा समाज म्हणजे इतिहासापासून संघर्षाशी एकरूप झालेला समाज. पराक्रम, स्वाभिमान, दिलदारपणा आणि लढाऊ वृत्ती ही या समाजाची ओळख राहिली आहे. परिस्थितीवर मात करत उभे राहण्याची ताकद या समाजाने प्रत्येक काळात दाखवली. मात्र बदलत्या सामाजिक-आर्थिक वास्तवात हा समाज अनेक अडचणींना सामोरा गेला. भूमिपुत्र हळूहळू भूमिहीन होत गेला, रोजगाराच्या संधी कमी झाल्या, शिक्षण आणि नोकरीत आवश्यक संरक्षण मिळाले नाही. या सगळ्या दुहेरी कात्रीत मराठा समाज अडकत गेला आणि दिशाहीनतेची भावना बळावत गेली.
अशा काळात समाजाला गरज होती ती सक्षम, अभ्यासू आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या नेतृत्वाची. समाजाच्या प्रश्नांना एकत्रित स्वर देणारे, शासनाच्या दरबारात ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व पुढे यावे, अशी अपेक्षा होती. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाने मोठा मोर्चा काढत आपली एकजूट दाखवून दिली. सरकारचे लक्ष वेधण्यात समाज यशस्वी झाला; मात्र या एकीला सातत्य देणारे नेतृत्व उभे राहणे ही खरी गरज ठरली.
याच टप्प्यावर किरण जाधव हे नाव बेळगावच्या मराठा समाजात आशेचे प्रतीक म्हणून पुढे येऊ लागले. कोणत्याही राजकीय निष्ठेपेक्षा ‘समाज प्रथम’ ही भूमिका जपत त्यांनी कार्याला सुरुवात केली. समाजाच्या अडीअडचणी, तरुणांचे प्रश्न, शिक्षण-रोजगाराचा संघर्ष या सगळ्यांशी स्वतःला जोडून घेत त्यांनी सातत्याने काम केले.
भाजपच्या कर्नाटकातील गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी मराठी समाजाचा भाजपमधील ठाम, विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली. अंतर्गत राजकारण, अपक्षांची संख्या आणि समीकरणांमुळे निकाल अनुकूल लागला नाही; मात्र नेतृत्वगुणांबाबत त्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.
आज मराठा समाजातील कोणताही प्रश्न असो—अन्यायाविरुद्ध लढा, वैयक्तिक अडचण किंवा संघटनात्मक गरज—‘कुणाकडे जावे?’ या प्रश्नाचे उत्तर अनेकांसाठी एकच ठरते, ते म्हणजे किरण जाधव. उच्चशिक्षित, यशस्वी उद्योजक आणि संघटनात्मक अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी समाजात विश्वास निर्माण केला आहे. भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी शांत, संयमी आणि अभ्यासू नेत्याची प्रतिमा उभी केली.
आज बेळगावमध्ये मराठा समाजाचे प्रभावी नेतृत्व कोण करेल, असा प्रश्न उपस्थित झाला तर भाजपमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे किरण जाधव. स्पष्ट दिशा, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची खरी ताकद आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची पद्धत त्यांना ‘आपला माणूस’ बनवते.
प्रत्येक पक्षाला समाजाशी नाळ जोडणारा नेता हवा असतो. भाजपमध्ये मराठा समाजाचा ‘आपला माणूस’ म्हणून किरण जाधव हे नाव आता उघडपणे समोर आलेले वास्तव आहे.
आज 12 जानेवारी – युवा दिन आणि त्याचबरोबर किरण जाधव यांचा वाढदिवस. या निमित्ताने मराठा समाजाच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या नेत्याला डी मीडिया न्यूज कडून मनःपूर्वक शुभेच्छा. समाजहिताचे कार्य अधिक व्यापक व्हावे आणि नेतृत्वाचा प्रवास अधिक बळकट व्हावा, हीच सदिच्छा.

