बेळगाव : १६ ऑक्टोबर २०२५
भारतीय जनता पक्षाने “I love Bharat ,I love RSS,” या संदेशाचा प्रसार करण्यासाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाळेकुंद्री (खुर्द) येथे विशेष जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत कार्यकर्त्यांनी घराघरात भेट देत पोस्टर लावले आणि नागरिकांशी थेट संवाद साधला.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुबाष पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी मंत्री प्रियंक खर्गे यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी म्हटले की, “संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्याचा आणि संघटनांचा अधिकार देते. संघावर बंदी घालण्याची मागणी ही अपरिपक्व आणि लोकशाहीविरोधी आहे.”
भाजप नेत्यांनी पुढे सांगितले की, “संघाने देशभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात केलेले योगदान मोठे आहे. मात्र, सत्तेच्या सोयीसाठी काही मंत्री अशा संस्थांचा अपमान करतात हे दुर्दैवी आहे.”
त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आवाहन केले की, “प्रियंक खर्गे यांच्या गैरजबाबदार वक्तव्याबद्दल त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे.”

