बेळगाव :
कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यांवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार संजय पाटील यांनी प्रखर शब्दांत खर्गे यांच्यावर टीका करत म्हटले की, “आरएसएसवर आरोप करण्याऐवजी त्यांनी आधी संस्कार शिकावेत.”
मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पाटील म्हणाले की, “प्रियांक खर्गे यांची विचारसरणी आणि बोलणे दोन्ही विसंगत आहे. त्यांनी अनेकदा विषयाशी संबंध नसलेली, असंबद्ध वक्तव्ये केली आहेत. आरएसएस ही राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणारी देशभक्त संघटना आहे. अशा संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे म्हणजे समाजहिताला धक्का देणारी कृती आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, “प्रियांक खर्गे यांनी मंत्री म्हणून ग्रामीण विकास, आयटी-बिटी, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करण्याची संधी असूनही ठोस कार्य केलेले नाही. फक्त ‘मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा’ हीच त्यांची पात्रता आहे. दोन-अडीच वर्षे मंत्री असूनही त्यांनी कोणतेही क्रांतिकारी काम दाखवले नाही.”
राज्यातील कायदा-सुव्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, शेतकऱ्यांचे नुकसान आणि आत्महत्या वाढत असल्याचे नमूद करत पाटील म्हणाले की, “या गंभीर विषयांवर लक्ष देऊन मुख्यमंत्री यांना पत्र लिहावे, आरएसएसविरोधात नव्हे.”
त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्यावरही त्यांनी टीका करत म्हटले की, “पक्षातील वरिष्ठांना खूश करण्यासाठी आरएसएसला उग्र संघटना ठरवणे हा अपमानास्पद प्रकार आहे. अशा वर्तनाने काँग्रेसची प्रतिमा अधिकच घसरत आहे.”

