जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जिच्या शौर्याचे कौतुक करून गौरव केलेल्या वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ झाला. उत्सवाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभयात्रेत विविध ठिकाणाहून आलेल्या कलापथकांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी संस्थानच्या शौर्य परंपरेचा वारसा सांगणाऱ्या वीर राणी बेळवडी मल्लमाच्या उत्सवाचा शुभारंभ संस्थानचा ध्वज फडकावून आणि वीर ज्योतीचे स्वागत करून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याशी सत्तावीस दिवस कडवी झुंज दिलेल्या राणी बेळवडी मल्लमाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी कौतुक करून जिंकलेला किल्ला तिला परत दिला असा इतिहास आहे.
राणी बेळवडी मल्लमाने यादवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारले. आजही शिवाजी महाराजांचे हे शिल्प पाहायला मिळते. वीर राणी बेळवडी मल्लमा उत्सवाच्या वेळी कुडल संगमचे मठाधीश जगद्गुरू बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शोभयात्रेत शेकडो महिला मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.

