बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान खासदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी बेळगावात भेट दिली.
टिळकवाडी येथील निवासस्थानी पोहोचताच पाटील यांनी प्रथम दळवी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दळवी यांच्या अखेरच्या क्षणांबाबत माहिती जाणून घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
सीमा प्रश्नासाठी आयुष्य झोकून देणारे झुंजार नेते म्हणून ओळख असलेले दीपक दळवी यांचे मंगळवारी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सीमाभागात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
या भेटीदरम्यान दळवी यांचे सुपुत्र बुलंद दळवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते.
यानंतर जयंत पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सीमाभागातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. सीमावादासंदर्भातील घडामोडींवर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

