"मराठा तरुणाईला व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याची गरज आहे"
बेळगाव: “मराठा समाजातील तरुणाई आज मोबाईल आणि व्यसनांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांना या दुष्परिणामांपासून मुक्त करून स्पर्धात्मक परीक्षांमधून यश मिळवून अधिकारी बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे,” असे मत काडा अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले.
ते बेळगाव शहरातील श्री जत्तीमठ देवस्थान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमात मैसूर दसरा स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या कुस्तीपटू, त्यांच्या प्रशिक्षकांचा तसेच स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यंदाच्या मैसूर दसरा कुस्ती स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याने 53 वर्षांनंतर “कर्नाटक कंटीरव केसरी” हा मानाचा किताब मिळवला आहे.
या यशाबद्दल पैलवान कामेश पाटील, त्यांचे प्रशिक्षक एनआयएस कोच प्रशांत पाटील आणि इतर विजेत्या मल्लांचा गौरव करण्यात आला.
कोच स्मिता पाटील यांनी सांगितले, “या वर्षी बेळगावच्या मुलींनी मेडलची लयलूट केली आहे. आमचा हेतू पुढील वर्षी दुप्पट यश संपादन करण्याचा आहे.”
त्याचबरोबर दसरा किशोरी स्वाती पाटील (कडोली) हिने “गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे हे यश मिळाले” असे मनोगत व्यक्त केले.
कंग्राळी खुर्द येथील श्रुती पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक (PSI), यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले, “स्पर्धात्मक परीक्षांची भीती न बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील होते. त्यांनी सांगितले की, “समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया रचणे होय.”
वकील अमर येळ्ळूरकर आणि समाजनेते किरण जाधव यांनीही यशस्वी तरुणाईचे कौतुक करत, “समाजाने त्यांच्या मागे उभे राहणे ही काळाची गरज आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमात सकल मराठा समाजाचे शिवराज पाटील, नागेश देसाई, प्रशांत भातकांडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेश्मा पाटील, राजू बिर्जे, प्रवीण पाटील, माधुरी जाधव, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले.

