बेळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमालढ्याला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंग्राळी खुर्द येथे येत्या 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा, तसेच युवा समिती सीमाभाग आयोजित मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
याशिवाय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आगामी डांबर मोर्चात संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
ही बैठक खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर होते. व्यासपीठावर सचिव एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सचिव एम. जी. पाटील यांनी बैठकीमागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला.
प्रास्ताविकात बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी 17 जानेवारी 1956 रोजी सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात पाच आंदोलक हुतात्मा झाल्याचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. सीमावाद न्यायालयात प्रलंबित असला, तरी लोकशाही मार्गाने रस्त्यावरचा संघर्ष तितकाच आवश्यक असून तो अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
येत्या 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कंग्राळी खुर्द येथे होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, दीपक पावशे आणि लक्ष्मणराव होनगेकर यांनी आपले विचार मांडत सीमाप्रश्नीचा लढा अधिक व्यापक व संघटित पद्धतीने पुढे नेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

