बेळगांव:सर्व धर्मांपेक्षा मानवता श्रेष्ठ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी हृदयस्पर्शी घटना कर्नाटकातील बेळगांव शहरात घडली आहे. धर्म, जात आणि पंथ यांच्या नावावर समाजात द्वेष पसरवला जात असताना, प्रेम, माया आणि बंधुत्वाची ही घटना अशा द्वेषाला चपराक देणारी ठरली आहे.
बेळगांवच्या न्यू गांधी नगर परिसरातील शांता कृष्णा जांगले (वय ८०) या हिंदू महिला पतीच्या निधनानंतर गेली २० वर्षे मुस्लिम कुटुंबासोबत राहत होत्या. दहावा क्रॉस, गुलफशा गल्ली येथे राहणारे मोहम्मद हनीफ यांनी शांता ताईंना आपल्या आईप्रमाणे जपले. शांता ताईही हनीफ यांना स्वतःचा मुलगा मानत होत्या.
या दीर्घ सहवासात कधीही धर्माची भिंत उभी राहिली नाही. ना धर्माबद्दल प्रश्न उपस्थित झाले, ना धर्मांतराचा कोणताही दबाव टाकण्यात आला. निखळ माणुसकी आणि आपुलकी याच नात्याचा पाया होता.
२० डिसेंबर रोजी आजारपण व वृद्धत्वामुळे शांता ताईंचे निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मोहम्मद हनीफ यांनी त्यांच्यावर उपचार केले. निधनानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली, मात्र अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे आले नाही.
अशा वेळी मोहम्मद हनीफ यांनी स्वतः पुढाकार घेत शांता ताईंचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. बेळगावीतील सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी परिसरातील अनेक मुस्लिम महिला उपस्थित होत्या.
आज अनेक ठिकाणी आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडले जात असताना, मोहम्मद हनीफ आणि त्यांची पत्नी आलिया यांनी एका हिंदू महिलेला तब्बल २० वर्षे आईसारखा सन्मान देत सांभाळले. ही घटना मानवतेची, सामाजिक सलोख्याची आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची अनोखी मिसाल ठरली आहे.
ही घटना इत्तेहाद न्यूजचे संपादक इक्बाल अहमद जकाती यांच्या माध्यमातून प्रकाशात आली. या कार्यात माजी महापौर विजय मोरे, कादर घीवाले, इनायत बुखारी, सलीमा गोकाकवाडे आणि निसार सनदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

