मुतगा (बेळगाव) – गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील भाताच्या वळ्यांना गुरुवारी पहाटे अज्ञातने आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आग रात्रीच्या वेळी लावण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेतकरी यल्लाप्पा गुंडू केदार हे सकाळी नियमितप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता संपूर्ण भाताच्या वळ्या जळून खाक झाल्याचे चित्र त्यांच्या नजरेस पडले. अचानक झालेल्या या अनर्थामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मुतगा परिसरात गेल्या सात–आठ वर्षांत अशा प्रकारची घटना प्रथमच घडली आहे. शिवारात रात्री येणाऱ्या काही तरुणांकडून दारू, गांजा, सिगारेट यांसारख्या गैरप्रकारांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवरही पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या आगीत सुमारे ₹५०,००० किमतीचे भात पिक पूर्णपणे जळून नष्ट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून तपासाची मागणी होत आहे.

