कर्नाटक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सुवर्ण सौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी हजारहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
बेळगावात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस भाजपच्या मोर्चामुळे गाजला. राज्यातील विविध भागातून भाजप कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेते, लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
याशिवाय बेरोजगारी, पाणीप्रश्न, विणकरांच्या समस्या समस्या सरकारने सोडवल्या नाहीत असा आरोप बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. भाजप कार्यकर्ते मोर्चाने सुवर्ण सौधकडे जात असताना पोलिसांनी मोर्चा अडवला. बॅरिकेडस ढकलून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.अखेर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हलवले.

