बेळगाव | प्रतिनिधी
शहर विकासाच्या नावाखाली राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील नियोजनशून्य कारभार आणि सरकारी निधीच्या संभाव्य अपव्ययाचे आणखी एक गंभीर उदाहरण बेळगाव शहरात समोर आले आहे. रामतीर्थ नगर परिसरातील सुमारे 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पादचारी मार्गावर तब्बल 450 विद्युत दिव्यांचे कंब उभारण्यात आले, मात्र हे दिवे आजतागायत एकदाही सुरू करण्यात आलेले नाहीत, ही धक्कादायक बाब आहे.
तांत्रिक निकषांनुसार पाहता, इतक्या अंतराच्या रस्त्यासाठी साधारणतः 30 ते 40 दिवे पुरेसे ठरू शकतात. मात्र येथे फक्त 10 फूट अंतरावर एक अशा पद्धतीने कंब उभारण्यात आले असून, हा निर्णय कोणत्या अभियांत्रिकी मोजमापांवर घेण्यात आला, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्यालगत उद्यान, नागरिकांची नियमित वर्दळ तसेच खेळणाऱ्या मुलांची उपस्थिती असूनही, प्रकाशाअभावी संपूर्ण परिसर रात्री अंधारात बुडालेला असतो. विशेष म्हणजे हे कंब अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आले असले तरी ते आजपर्यंत कार्यान्वितच झालेले नाहीत.
यासंदर्भात चौकशी केली असता, संबंधित यंत्रणेकडून “हाय टेन्शन वीजवाहिनीखाली कंब उभारले गेल्याने परवानगी मिळालेली नाही” असे कारण पुढे केले जाते. मात्र, परवानगीच नसेल तर ही कामे सुरुवातीलाच कशी मंजूर झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
काही जागरूक नागरिकांनी तर हा प्रकार जाणीवपूर्वक चुकीच्या ठिकाणी कंब उभारून, भविष्यात ते काढून दुसरीकडे बसवण्याच्या नावाखाली पुन्हा निधी खर्च करण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सरकारचा किती पैसा खर्च झाला, या योजनेचा प्रत्यक्ष लाभार्थी कोण, आणि यासाठी जबाबदार अधिकारी कोण आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा अकार्यक्षम आणि संशयास्पद कामांमुळे नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी अंधार आणि असंतोषच पदरी पडत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

