वडगावमधील 100 वर्षे जुन्या ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन
बेळगाव तालुक्यातील वडगाव नजर कॅम्प परिसरात असलेल्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्वपूर्ण कार्य प्यास फाउंडेशनतर्फे हाती घेण्यात आले आहे. वारसा जतन आणि शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.
कुरुंदवाड सरकारच्या काळात बांधण्यात आलेली ही दगडी विहीर तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण मानली जाते. संपूर्णपणे दगडी बांधकामातून उभारलेली ही विहीर एकेकाळी वडगाव गावाचा मुख्य जलस्रोत होती. अनेक नैसर्गिक झऱ्यांमुळे ही विहीर कधीही आटत नसे आणि वर्षभर स्वच्छ, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करत असे. आजही गावातील ज्येष्ठ नागरिक या विहिरीशी निगडित आठवणी आणि तिच्या उपयुक्ततेच्या कथा अभिमानाने सांगतात.
मात्र, काळाच्या ओघात देखभालीअभावी ही ऐतिहासिक रचना दुर्लक्षित राहिली. हळूहळू विहीर जीर्ण होत गेली आणि अखेरीस पूर्णतः मुजून तिचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर होते. या विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन, प्यास फाउंडेशन, बेळगावने एकेपी फेरोकास्टच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून तिच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला.
या प्रकल्पाचा शुभारंभ बेळगाव शहराचे महापौर श्री. मंगेश पवार, एकेपी फेरोकास्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पराग भंडारे, श्रीमती प्रीती भंडारे व श्री. देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, सचिव डॉ. प्रीती दोड्डवाड, उपाध्यक्ष श्री. अभिमन्यू दागा, कोषाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पसारी, संयुक्त सचिव श्री. दीपक ओऊळकर तसेच सभासद श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. अवधूत सामंत, श्री. रोहन कुलकर्णी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
पुनरुज्जीवन पूर्ण झाल्यानंतर ही ऐतिहासिक विहीर पुन्हा एकदा विश्वासार्ह जलस्रोत म्हणून कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, हा प्रकल्प पर्यावरणीय जाणीव, सामुदायिक सहभाग आणि सांस्कृतिक वारसा जतन यांचे प्रभावी उदाहरण ठरणार आहे.

