बेळगाव, १० सप्टेंबर :
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या ‘शांताई विद्या आधार’ या सामाजिक उपक्रमाने पुन्हा एकदा दोन विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्काची जबाबदारी स्वीकारली आहे. नवर्योत टेक्नॉलॉजिजच्या सहकार्याने शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर विद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे फी भरण्यात आले.
विद्यालयात आयोजित छोट्या कार्यक्रमात शांताई विद्या आधारचे कार्यकर्ते अॅलन विजय मोरे, गंगाधर पाटील आणि संजय वाळवेकर यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मॅडम व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द केला.
विशेष म्हणजे शांताई विद्या आधार हा उपक्रम जुन्या वर्तमानपत्रांचा, पुस्तकांचा (रद्दी) तसेच छोट्या देणग्यांचा उपयोग करून निधी गोळा करतो व तो गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला असून शिक्षणासाठी समाजातील बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

