बेळगाव :
संगमेश्वरनगर परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या तब्बल ७५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील तपास ठप्प असल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने पुन्हा एकदा केला आहे.
मीना लालचंद चौहान आणि त्यांचा मुलगा संजयकुमार चौहान यांनी गुरुवारी आपल्या वकिलांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तपासात होत असलेल्या विलंबाबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
चौहान कुटुंबाने 5 जून 2025 रोजी बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक 60/2025 दाखल केला होता. तथापि, “वारंवार पाठपुरावा करूनही तपासात कोणतीही अर्थपूर्ण प्रगती झालेली नाही,” असा आरोप संजय चौहान यांनी केला.
तपासादरम्यान स्वतःचे पूर्ण सहकार्य करूनही “वारंवार आश्वासने, अपमानास्पद वर्तन आणि धमक्या मिळत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांच्या वृद्ध आई मीना चौहान यांनी माध्यमांशी बोलताना केला.
याशिवाय, त्यांच्या घरात काम करणाऱ्या शाहूनगर येथील गंगा राठोड यांनी झोपेच्या गोळ्या देऊन दागिने लंपास केले असल्याचा आरोपही मीना चौहान यांनी केला.
कुटुंबाने बेळगाव पोलिस आयुक्त, डीसीपी गुन्हे, डीसीपी कायदा-सुव्यवस्था आणि एसीपी यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटिसीलाही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
“छोट्या छोट्या कामासाठी पोलिसांनी आम्हाला अनेकदा बोलावले, आम्ही सहकार्यही केले. परंतु प्रकरण सोडवण्याऐवजी दुर्लक्षित केले जात आहे. या निष्काळजीपणामुळे आम्ही मानसिक त्रास सहन करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कठोर निर्देश द्यावेत,” अशी मागणी चौहान कुटुंबाने केली.

