बेळगाव
सीमाप्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या ‘लाखो सह्यांच्या’ मोहिमेला आता लोकचळवळीचे रूप येत असून, या उपक्रमाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी येळ्ळूर विभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास घाडी होते.
बैठकीच्या प्रारंभी गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला.
सीमालढ्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावाने या प्रश्नावर नेहमीच आघाडी घेतली आहे. बैठकीत स्वाक्षरी मोहिमेचे स्वागत करताना, “हा केवळ पत्रकारांचा नव्हे, तर प्रत्येक सीमावासियाच्या अस्तित्वाचा लढा आहे. येळ्ळूर विभागातील प्रत्येक मराठी भाषिक या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवेल,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस अध्यक्ष विलास घाडी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मनोहर अ. पाटील, परशराम घाडी, शंकर टक्केकर, मल्लप्पा काकतिकर, तानाजी पाटील, महेश कुगजी, शुभम जाधव, आकाश नायकोजी, अमित मुचंडी, मदन धामणेकर, नागराज चांगळी, प्रसाद पाटील, भाऊराव मुंचंडीकर, योगेश कदम, अक्षय पाटील, राहुल कुगजी आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि मराठी भाषिकांची एकजूट दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. येळ्ळूर व परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या सह्या गोळा करून मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

