बेळगाव: श्रीनगर परिसरातील पाणीपुरवठा केंद्राजवळील अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेला रस्ता अखेर नव्याने बांधण्यात आला असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि पाणी साचण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत उत्तर बेळगावचे आमदार असिफ (राजू) सेट यांनी तातडीने पाठपुरावा करत रस्त्याच्या पुनर्बांधणीस प्राधान्य दिले. त्यांच्या पुढाकारामुळे रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाले असून, सध्या हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुरक्षित आणि सुरळीत झाले आहे. नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त करत, वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल आमदार असिफ (राजू) सेट यांचे आभार मानले आहेत.
हा प्रकल्प म्हणजे मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून, संपूर्ण मतदारसंघात भक्कम रस्ते व पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आमदारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे.

