बेळगाव : चैत्र पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सासनकाठी यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली, नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान तसेच कोंडुस्कोप परिसरातून बैलगाड्या आणि सासनकाठी घेऊन भाविक पारंपरिक पद्धतीने पायी कोल्हापूरकडे प्रस्थान करत आहेत.
या यात्रेत सहभागी होणाऱ्या बैलजोड्यांसाठी विशेष पौष्टिक आहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच पायी चालणाऱ्या भाविकांना शिधा स्वरूपात आवश्यक वस्तूंचे वितरण करून मंदिर प्रशासनाने सेवाभाव जपला.
यात्रेच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विधीपूर्वक पूजा आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्यासह अभिजीत चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुळकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर, अभय लगाडे, ज्योतिबा कावळे, प्रथमेश कावळे, रणजीत जाधव, सचिन सत्तेगिरी, आनंद बाळेकुंद्री, मदन मनगुतकर, अनिल पावशे, दौलत जाधव, संतोष हजारी, पवन मन्नुरकर, अभी पवार, निसर्ग चव्हाण, रोशन नाईक यांच्यासह महिला सेवेकरी व ट्रस्टी उपस्थित होते.

