भारतात इंग्रजांच्या विरुद्ध सर्वप्रथम लढा देऊन विजय मिळवणाऱ्या वीर राणी कित्तूर चन्नम्माच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. राणी कित्तूर चन्नमाने इंग्रजावर विजय मिळवून एकशे दोन वर्षे पूर्ण झाली, त्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
राज्यातील विविध ठिकाणाहून आलेली कला पथके शोभयात्रेचे आकर्षण ठरली.
कर्नाटकात फिरून आलेल्या वीर ज्योतीचे बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वागत केले. त्यानंतर कित्तूर संस्थानच्या ध्वजाचे ध्वजारोहण महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शोभयात्रेला प्रारंभ करण्यात आला. शेकडो सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
यक्षगान कलाकारांनी वाद्याच्या तालावर नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वीर राणी कित्तूर चन्नमाच्या वेषात घोड्यावर स्वार झालेल्या मुलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्रिशूल नृत्य करणाऱ्या महिला कलाकाराने देखील साऱ्यांची मने जिंकली. नृसिंह आणि वराह अवतार धारण केलेले कलाकार देखील लोकांचे आकर्षण ठरले होते. चित्रविचित्र मुखवटे परिधान करून अनेक कलाकार शोभयात्रेत सहभागी झाले होते. विदुषकांनी देखील नृत्य करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
हातात भली मोठी गदा घेतलेला हनुमान लहानांच्या बरोबरच थोरांचेही लक्ष वेधून घेत होता. संबळच्या तालावर हातात तलवार घेऊन नृत्य करणाऱ्या कलाकारानी देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने वस्तू प्रदर्शन, फळे पुष्प प्रदर्शन, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

