बेळगाव, ४ नोव्हेंबर :
राज्य भाजप अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील गुरळापूर येथे उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत सरकारकडे योग्य ऊस दराची मागणी केली.
विजयेंद्र म्हणाले, “मी येथे केवळ माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा मुलगा म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी आलो आहे. उस दराचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असून तो केवळ चर्चा आणि समन्वयातूनच सुटू शकतो.”
गेल्या काही दिवसांपासून गुरळापूर येथे शेतकरी राज्य सल्लागार दर (SAP) जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या मागण्यांबाबत सरकारने संवेदनशीलतेने विचार करून तोडगा काढावा, असे आवाहन विजयेंद्र यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “सरकार निष्क्रिय राहते तेव्हा विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत उभे राहणे ही आमची जबाबदारी असते. त्यामुळे मी आज सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.”
https://youtube.com/shorts/0i5aLJABKLg?si=NF3sauU7UFoL0wBQ
विजयेंद्र यांनी २०१४ मधील घटनेचा उल्लेख करताना सांगितले की, “त्यावेळी ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी विठ्ठल अरभावी यांनी आपले प्राण दिले होते. त्या वेळी माझे वडील येडियुरप्पा यांनी त्या घटनेनंतर मुख्यमंत्री यांच्यावर दबाव आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता.”

