बेळगावजवळील चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात २८ हरिणांचा मृत्यू; संसर्गाची भीती वाढली
बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयात गेल्या काही दिवसांत मोठा जैविक संहार उघड झाला असून एकूण २८ हरिणे मृतावस्थेत आढळली आहेत. सलग वाढत असलेल्या मृत्यूमुळे प्राणीसंग्रहालयाचे वातावरण गंभीर बनले आहे.
प्राथमिक तपासणीत जिवाणू संसर्गाचा ठसा आढळत असल्याची भीती वनविभागाने व्यक्त केली आहे. सुरुवातीला ८ हरिणांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता; मात्र आज आणखी २० हरिणे अचानक दगावल्याने परिस्थितीचे गांभीर्य दुणावले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी तत्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यूच्या नेमक्या कारणांची खात्री करण्यासाठी म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील तज्ज्ञ पशुवैद्यकांचे विशेष पथक आज संध्याकाळपर्यंत बेळगावमध्ये दाखल होणार असल्याचे प्रशासनाने कळवले.
एसीएफ नागराज यांनी सांगितले की,
“सर्व मृत हरिणांचे मरणोत्तर परीक्षण सुरू असून नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सुरुवातीपासूनच आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले होते. सध्या इतर प्राण्यांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत.”
दरम्यान, या प्रकरणात योग्य आणि वेळेवर माहिती उपलब्ध न केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात हरिणांचे मृत्यू प्रथमच नोंदवले जात असल्याने उर्वरित प्राण्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
प्राणिसंग्रहालयात सुरू असलेल्या तपासणीमुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना लागू केल्या आहेत.

