बेळगाव शहरातील शास्त्रीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ एका पाच वर्षांच्या मुलाला कुत्र्यांनी चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वोरोनिका भाटी असे या जखमी बालकाचे नाव असून, खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मूल जखमी झाले असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी उद्यान व आसपासच्या परिसरात १५ ते २० भटकी कुत्री नियमितपणे फिरत असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही या भागात अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, केवळ शास्त्रीनगरच नव्हे तर बेळगाव शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बंध, निर्जंतुकीकरण, पुनर्वसन व नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेनंतर पालक वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, शहरातील उद्याने व सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

