बेळगावात थंडीपासून बचावासाठी कोळशाची शेगडी पेटवली; धुराने तिघा तरुणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
बेळगाव: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाची शेगडी खोलीत पेटवून झोपलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. बेळगावातील अमन नगर भागात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत झालेल्या तरुणांची नावे रिहान मट्टे (22), मोईन नालबंद (23) आणि सर्फराज हरपनहळी (22) अशी आहेत. तर शहानवाज (19) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चारही मित्र एका भाड्याच्या खोलीत राहत होते. बेळगावात वाढलेल्या थंडीमुळे त्यांनी रात्री कोळशाची शेगडी पेटवून खोलीतच ठेवली. मात्र खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने शेकोटीचा धूर खोलीत साचून राहिला. धुराचा प्रभाव वाढत जाऊन तिघांचे झोपेतच गुदमरून निधन झाले, तर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माळमारुती पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. अमन नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती आमदार असिफ राजू शेठ व युवा नेते अमन सेठ यांना समजताच घटनास्थळी त्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेमुळे थंडीच्या दिवसात कोळशाच्या शेगड्यांमुळे होणाऱ्या धोकाबाबत पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

